State News

आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार : नाना पटोले

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निडवणूक शिवसेनेला सोबत घेऊन लढण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही 2024ची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशीही आघाडी करण्यासाठी चर्चा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येणार का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. (We Will Discuss With Prakash Ambedkar Regarding Future alliance: nana patole) नाना पटोले आज अकोल्यात आले होते. यावेळी मीडियाशी बोलताना पटोले यांनी हे मोठं विधान केलं. 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे, असं पटोले म्हणाले. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आघाडीच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं. आंबेडकर आणि काही छोट्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करण्यात येईल. मात्र, अद्याप कुणाशीही चर्चा सुरू झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पटोले यांच्या या विधानामुळे राज्यात नव्या समीकरणाची नांदी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

राऊतांकडून शिकत असतो यावेळी त्यांनी ‘सामना’तील अग्रलेखावरून शिवसेना नेते संजय राऊत यांना तिरकस टोला लगावला आहे. संजय राऊतांच्या मार्गदर्शनातच आमची वाटचाल सुरू आहे. त्यांच्याकडूनच आम्ही शिकत असतो, असा टोला त्यांनी लगावला.

पवार काल काय म्हणाले होते? काल राष्ट्रवादी काँग्रेसचा 22 वा वर्धापन दिन होता. त्यानिमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आगामी निवडणुका शिवसेनेसोबतच लढण्याचे संकेत दिले होते. राज्यात तीन पक्षाचं सरकार आलं. त्या दिवसापासून हे सरकार टिकण्याबाबत सतत चर्चा होत होती. किती दिवस? किती आठवडे? किती महिने?, एखादं वर्ष हे सरकार टिकेल, अशी चर्चा होत होती. पण आता ती चर्चा होत नाही. काल-परवा थोडीबहुत चर्चा झाली. पण मला त्याची चिंता वाटत नाही. राज्याचं शिष्टमंडळ मोदींना भेटलं. त्यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. दोन्ही नेते स्वतंत्र बसले. काही चर्चा विचारविनियम केला. कुणी काही करो, पण लगेच वेगवेगळ्या प्रकारच्या शंका वावड्या उठवल्या गेल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत शिवसेना आली आहे. सेनेसोबत कधी काम केलं नाही. महाराष्ट्र अनेक वर्षापासून सेनेला पाहतो आहे. त्यानुसार सेना विश्वास असणारा पक्ष आहे. कुणी काहीही शंका घेतली तरी शिवसेना भूमिका सोडणार नाही. कुणी असं काही मांडत असेल तर ते वेगळ्या नंदन वनात राहत आहेत, असं म्हणावे लागेल, असं सांगतानाच हे सरकार पाच वर्षे टिकेल. नुसतंच पाच वर्षे टिकणार नाही तर उद्याच्या लोकसभा- विधानसभेला हे सरकार जोमानं काम करेल. या बद्दल माझ्या मनात शंका नाही, असं पवारांनी सांगितलं. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्रित येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. (We Will Discuss With Prakash Ambedkar Regarding Future alliance: nana patole)

Comment here