City News

‘क्रुझवरील पार्टीतून दोघांना सोडलं! त्यातला एक भाजप नेत्याचा मेहुणा’, नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप

मुंबई : NCP विरुद्ध NCB हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. क्रुझवरील पार्टीतून दोघांना सोडलं असल्याचा आरोप मलिक यांनी केला असून एक भाजप नेत्याचा मेहुणा होता असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे. याबाबत उद्या मी खुलासा करणार आहे, असंही मलिक यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांनी मीडियाला बाईट दिली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की 8 ते 10 लोकांना पकडले आहे. त्यावेळी मी प्रश्न विचारला होता की, एक अधिकारी संपूर्ण कारवाई करतोय तो असे अंदाजे उत्तर कसे काय देऊ शकतो. जर 10 लोकांना पकडले असेल तर कदाचित 2 लोकांना सोडलं असेल. आता हे खरं असल्याचं समोर आलं आहे. जे दोघे सोडण्यात आले, त्यामध्ये भाजपचे एका नेत्याचा मेहुणा त्यामध्ये होता. त्याबाबत उद्या मी खुलासा करणार आहे, असंही ते म्हणाले.मलिकांनी म्हटलं की, त्या दोन लोकांना आणण्यात आलं होतं आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आले आहे. मलिक म्हणाले की, भ्रष्टाचार मुक्त करणे म्हणजे भाजपच्या गंगेत डुबक्या मारणे असं आहे का? कुठल्या नेत्याने किती बँका बुडावल्या आहेत ते आता मी बाहेर काढणार आहे, असंही ते म्हणाले.

भाजपच्या कार्यकर्त्यांना त्या क्रूझवर पकडलेल्या कार्यकर्त्यांना अटक करण्याचा अधिकार दिला काल नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यावर आरोप केले होते. अधिकारी कस्टम मधून एनसीबीला कसा येऊन बसला, त्यासाठी कुठल्या मंत्र्याच्या घरी लॉबिंग करण्यात आली, कुणाच्या बोलण्यावरून हा अधिकारी लोकांना भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे काढण्याचं काम करतो हे मी वेळ आली की लवकरच बाहेर काढणार आहे असं म्हटलं होतं. एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्त्यावर पत्रकार परिषद घेऊन आम्हाला कोर्टात जाण्याचा सल्ला दिला परंतु त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी पूर्णपणे एनसीबीच्या कायद्याचा भंग केला आहे. त्यांनी मला उत्तर द्यावं की कुठल्या अधिकाराने त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना त्या क्रूझवर पकडलेल्या कार्यकर्त्यांना अटक करण्याचा अधिकार दिला. माझा स्पष्ट आरोप आहे हा अधिकारी केवळ प्रसिध्दीसाठी छापे टाकण्याचं काम करतो आहे. त्यामुळे आता देशात कायद्याचं राज्य आहे की नाही असा सवाल उपस्थित राहू लागला आहे, असं मलिक म्हणाले होते.

Comment here