AgricultureCity News

जायकवाडी जलशयात होतेय वाढ,नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

कायगाव (जि.औरंगाबाद) : नगर (Ahmednagar), नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे तेथील धरण भरल्याने त्यातून पाणी जायकवाडी जलाशयाच्याच्या दिशेने विसर्ग केला जात आहे. त्यामुळे कायगाव टोका (ता.गंगापूर) येथील प्रवरा (Pravara), गोदावरी (Govdavari) नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीला पूर आला आहे. दरम्यान नदी काठच्या नागरिकांनी सतर्क, सुरक्षितस्थळी राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जायकवाडी (Jayakwadi Dam) वरील धरणातून (Aurangabad) आज मंगळवारी (ता.14) रोजी सोडण्यात आलेले पाणी भंडारदरा -3256, निळवंडे -19457,ओझर-14127, दारणा -12788,कडवा- 4240 , आळंदी-80,वालदेवी -183,गंगापूर -, 2212 नांदूर मध्यमेशवर 20823 इतके क्यूसेक्स पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावले आहेत. सध्या स्थितीत जायकवाडी जलाशयात पोहोचत असलेले पाणी नागमठाण 19280, नेवासा प्रवरा नदी 1068, मालुंजा शिवना नदी 464, भगूर 1000 असे मिळून 21812 क्यूसेक्स पाण्याची आवक चालू आहे.

जायकवाडी वरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास तेथून आणखी मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येऊ शकते, अशी माहिती गंगापूर येथील जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंता नेहा धुळे यांनी दिली आहे. प्रवरा, गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे .त्या पाण्याच्या आवकमुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढू लागली आहे. तसेच गंगापूर तालुक्यातील नागझिरी नदी, टेंभापुरी मध्यम प्रकल्पाचे ओव्हरफ्लो पाणी आणि पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमानामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे.

पोलिसांनी लक्ष देण्याची गरज

औरंगाबाद-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कायगाव टोका येथील गोदावरी नदी पुलावरून पुराचे पाणी पाहण्यासाठी आणि मोबाईल सेल्फी काढण्यासाठी पर्यटक, नागरिकांची गर्दी होत आहे. रोडवर छायाचित्र काढण्यासाठी वाहने उभे करत असल्याने वाहतूक जाम होते. काही शौकीन हवेसे,गवसे जीवधोक्यात घालून पुलाच्या कठड्यांवर उभे राहून फोटो काढत आहेत. यापूर्वी जीवितहानीच्या अनेक घटना घडल्या आहेत. नेवासा,गंगापूर पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पिके पाण्यात

गोदावरी नदीला विसर्ग करण्यात आलेले पाणी जुने कायगाव, जुने जामगाव, जुने ममदापुर, जुने अंमळनेर, जुने लखमापूर, धनगरपट्टी आदी गंगथंडीगाव शिवारात पांगत आहे. जायकवाडी धरणाच्या बॅक वाॅटर फुगवटा क्षेत्रात असलेली कृषीपंप ,पाईप, चारापिके काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. नदी पात्र उथळ झाल्याने पाणी पात्राबाहेर लवकर पंगत असल्यामुळे गाळपेरा क्षेत्रातील शेकडो हेक्टरवरील कापूस, बाजरी, सोयाबीन, मका, ऊस पिके पुराच्या पाण्यात जात आहेत.

जायकवाडी धरणावरील पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे जायकवाडीमध्ये येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे. आज व उद्या ही पावसाची शक्यता असल्याने विसर्ग आणखी वाढू शकतो.

– नेहा धुळे, शाखा अभियंता, गंगापूर व नागमठाण पूरनियंत्रण कक्षप्रमुख

Comment here