City News

Hingoli Car Accident kills four teachers as Car drown : Case registered on Contractor

हिंगोली, 16 June. : पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कार पडून हिंगोलीत चौघा शिक्षकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेला जबाबदार असलेल्या कल्याण टोलच्या ठेकेदाराविरोधात मृतांच्या नातेवाईकांनी तक्रार दिली होती. त्यानंतर आरोपी ठेकेदाराविरोधात कलम 304 अन्वये सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीतील राज्य महामार्गावर घडलेल्या विचित्र अपघातामध्ये चौघा जणांना प्राण गमवावे लागले होते. सेनगावनजीक रविवारी रात्री हा प्रकार घडला. सध्या हिंगोलीत अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरु आहेत. सेनगाव जिंतूर रस्त्यावरही काम सुरु असून त्यासाठी रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला होता. मात्र, ठेकेदाराने रस्त्यावर दिशादर्शक फलक न लावल्यामुळे एक कार खड्ड्यात कोसळली.

पावसामुळे या खड्ड्यात पाणी साठले होते. अंधारात पाण्याने भरलेला खड्डा चालकाच्या नजरेला पडला नाही. त्यामुळे भरधाव कार वेगाने जाऊन खड्ड्यात पडली. कार खड्ड्यात पडल्यानंतर लगेच लॉक झाली. पाण्यात बुडलेल्या गाडीतून बाहेर पडता न आल्यामुळे चारही जणांचा गाडीतच गुदमरुन करुण अंत झाला.

दुचाकीस्वारामुळे घटना उघड : कार खड्ड्यात कोसळल्यानंतर बराच वेळ कोणालाही पत्ता लागला नव्हता. काही वेळानंतर एक दुचाकीस्वार याच मार्गावरुन जात होता. त्यावेळी रस्त्यावरील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात त्याला कारच्या हेडलाईटचा प्रकाश दिसला. तेव्हा या दुचाकीस्वाराने जवळच्या एका धाब्यावर जाऊन या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी रुग्णवाहिका आली आणि कारमधील चौघांनाही बाहेर काढण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेईपर्यंत चौघांचाही मृत्यू झाला होता. चौघेही लोणार तालुक्यातील खळेगाव, पळखेडा येथील रहिवासी होते.

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अपघात : गेल्या दोन वर्षांपासून पुलाचं काम सुरु असूनही ठेकेदाराकडून रस्त्यावर कोणताही दिशादर्शक फलक लावण्यात आला नव्हता. रस्ता वळणाचा असल्याने वाहन चालकांच्या रस्ता सुरू असलेल्या पुलाचे काम लक्षात येत नाही. त्यामुळे या चौघांचाही बळी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गेला आहे. संबंधितावंर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी स्थानिक करत आहेत.

Comment here