City News

होमबातम्या ”कोविडला आमंत्रण देणारी गर्दी चालणार नाही”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, 07 जून: आजपासून महाराष्ट्र (Maharashtra Unlock) अनलॉक झालं आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात आलेत. एकूण पाच स्तरात राज्य अनलॉक झालं आहे. अनलॉकच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना निर्देश दिलेत.

कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच लेव्हल ठरवण्यात आल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत.

गर्दी चालणार नाही- मुख्यमंत्र्यांचा इशारा

नव्या आदेशात वर्गीकरण केले असले तरी कोणत्याही परिस्थितीत कोविडला आमंत्रण देणारी गर्दी , समारंभ, सोहळे चालणार नाहीत आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे. याची जिल्हा प्रशासनानं काळजी घ्यावी, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तसंच दैनंदिन व्यवहार किती उघडायचे, किती काळ सुरु ठेवायचे, त्याच्या वेळा या सर्व गोष्टी त्या त्या भागातील प्रशासनाने ठरवावं, असंही मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे. तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन अधिक काळजी घ्या आणि सावध रहा, रात्रच नव्हे तर दिवस देखील वैऱ्याचा आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शंका असेल तर निर्बंध सुरूच ठेवा

कोरोना रुग्णाच्या संख्येत चढ उतार होत असतात. आपण लेव्हल्स ठरविल्या असल्या तरी संसर्ग किती वाढेल याविषयी आपल्या मनात शंका असतील तर व्यवहारांवर निर्बंध घाला , कुठल्याही दबावाला बळी पडू नका असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. निर्णयाचा अधिकार सर्व स्थानिक जिल्हा प्रशासनाना दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना सांगितलं की, आपल्यासमोर कोरोनाचा संसर्ग राज्यभर सारखा नाही, त्याची तीव्रता कमी-जास्त आहे. हे लक्षात घेऊन एकीकडे या विषाणूची साखळी तोडणे आणि दुसरीकडे आपले आर्थिक, सामाजिक दैनंदिन व्यवहार शिस्तबद्धरित्या सुरु कसे होतील हे पाहणे एवढ्याच करीता निर्बंधांच्या या पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत. आपण स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून या निकषांच्या आधारे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घ्यायचा आहे.

कोरोनामुक्त गावांची टक्केवारी देखील गृहीत धरणार

नागरिकांनी कोविडच्या या काळात आरोग्याचे नियम पाळून तसेच कोविड सुसंगत वर्तणूक ठेऊन आपापल्या जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास सहकार्य करायचे आहे. यासाठी आपापल्या जिल्ह्यात पुरेशी जनजागृती करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. ग्रामीण भागात कोरोना वाढतोय, त्याला रोखण्यासाठी आपण कोरोनामुक्त गाव करा म्हणून आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी केले आहे. या कोरोनामुक्त गावांची टक्केवारी देखील आपल्याला या नव्या पातळ्यांमध्ये गृहीत धरावी लागेल.

Comment here